गोष्ट

गोष्ट ऐकतच मी मोठा झालो
गोष्टीत एक अटळ युद्ध
युद्धात सगळं जाळून व्हायचं खाक
अपरीहार्य

मला गॅरंटीड यायची मजा
गोष्ट ऐकताना

गोष्ट खरं म्हणजे खूप साधी होती
एकाच शब्दाची

प्रेम

प्रेमाला चिकटले दुसरे अनेक शब्द
आणि वाढत गेला संघर्ष
गोष्टीमध्ये

वजाबाकीनंतर उरलेली चिमणी

१.
माझ्या कवटीत
हजारो चिमण्या
हजारो वर्षांपासून
रूजत घातलेल्या
आता फुलल्या आहेत

चिवचीवाट चीवचीव
किलबिल कलकलाट

सुसुत्रबद्ध गोंधळ

या गोंधळातून
तुम्ही म्हणताय
एक चिमणी निवडा

एक चिमणी जी योग्य असेल

एक चिमणी जी हे जग सुंदर बनवेल

एक चिमणी जिची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात

एक इवलीशी,
खीजगणतीच्याही गीणतीत न येणारी
आत्ता होती आणि आत्ता नाहीच्या मध्ये
जमेल तेवढं चिवचीवणारी

आपण चिवचीवतोय याचंही भान
तिला आहे की नाही कुणास ठाऊक

२.
योग्य चिमणीला नेमकं पकडतां यावं चिमटीत
म्हणून मी बसलो होतो एका झाडाखाली
सापडली चिमणी चिमटीत
आणि चिमटी चिवचीवायला लागली
चिमटीच्या चिवचीवीला फुटले चिमण्यांचे धुमारे
कधीतरी त्यातली एखादी चिमणी
तुमच्या चिमटीत अलगद सापडते
आणि तुमची चिमटी चिवचीवायला लागते.

आत्ता आहेः योग्य चिमणी
आत्ता नाहीः चिमणी गुडूप

आणि तुम्ही तुमची चिमटी गोंजारत बसता

३.
योग्य चिमणीच्या शोधात
मी वजा करत गेलो एकेक करून सर्व चिमण्या
तरी वजाबाकीची एक चिमणी
उरलीच शिल्लक

आणि वजाबाकीच्या उरलेल्या चिमणीकडे
गमतीने बघणारी
एक चिमणी

आणि गमतीने बघणाऱ्या चिमणीकडे
बघणारी आश्चर्यचिमणी

आणि अशीच न संपणारी लांबलचक शेपूट
चिमण्यांची

वजाबाकीनंतर उरलेली

फुशारकीची फुंकर

सगळ्यांचीच सगळी गणीतं
चुकलेली असतात

सगळे युक्तीवाद सगळ्यांचे
फेल असतात

लॅाजीक सगळ्यांचंच
गेलेलं असतं पेंड खायला
ऐनवेळी

ऐनवेळी
अवसानघात करतो
हा सुधारलेला मेंदू
कपाळाच्या मागे लपून बसलेला

लॅाजीक कपाळाची
गोंधळभींत कधीही कोसळेल
आणि उघडा पडेल हा
अतीशहाणा लोळागोळा

आपण फक्त फुशारकीच्या फुंकरीने
फुगवत रहायचा
हा बलून

तोपर्यंत.

फेसबुकवरुन – स्वप्नील शेळके

राईचा पर्वत करणारी इग्नेशियस डायसची कविता : ‘कुल्फीवाला वितळला तो उष्ण दिवस’

‘कुल्फीवाला वितळला तो उष्ण दिवस’ ही इग्न्याशिअसची कविता तीन भागांमध्ये येते.

पहिला भाग वरवर पाहता (आकळण्याच्या दृष्टीने विचार करता) साधा आणि सरळ आहे. पण तरी या भागात काहीतरी मॅजिकल आहे. ते ‘काय’ संगितले आहे त्यामुळे नसून ते ‘जसे ’ सांगितले आहे त्या शैलीमुळे आलेले आहे. ती शैली म्हणजे “दुपारला बांधलेली आहे/ घट्ट घंटी” या दोन ओळींमध्ये मला मॅजिक देऊन गेलेली शैली. दुपारला ‘बांधलेली’ असे आल्याने हा अनुभव कवितिक झाला. कवितिक असे म्हणताना आतमध्ये होणारी थरथर , भावनांची कालवाकालव किंवा वेगवेगळ्या वाचक समुहांच्या आतील भावविश्वाला स्पर्शून जाण्याची ताकद या आणि अशा अनेक बाबी यात अंतर्भूत होतात. उदाहरणार्थ मला आठवला तो शासकीय वसाहतीत गेलेल्या माझ्या बालपणाच्या दिवसांमधला दुपारच्या कडकडीत चारच्या उन्हात नेमाने येणार ‘बालिया’ नावाचा मावा कुल्फीवाला. मी तिशीत घुसलोय. तो बालिया मी माझ्या वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत अनुभवला होता. त्याचं आणि माझ्या त्या काळातील अवस्थेच मिळून एक स्वतंत्र आणि सार्वभौम अस्तित्व होतं. त्या दोन बाबींच्या संगमात ज्या विचारांच्या लहरी निर्माण होत होत्या त्यातील तथ्ये जरी मला आज धूसर पद्धतीने जाणवत असली तरी त्यातील भाव मात्र या दोन ओळींनी जीवंत करून दिला. तो जीवंत झाल्याने माझा व्यावहारिक फायदा काय ? तर कदाचित काहीच नाही. केवळ स्मरणरंजन असेही कुणी म्हणू शकेल … किवा खूप काही यापलीकडे असेलही…. त्या कुल्फीवाल्याला अनुभवणारं बालपण आणि निरागसता जी काळाच्या ओघात संपत गेली , दबत गेली त्या हरवत गेलेल्या भावनांच विरेचण या ओळींमध्ये होतं. होऊ शकतं . मला ते तसं वाटलं.

आता याच भागातली उर्वरित कविता पाहिली तर ती इग्नेशियस एका विशिष्ट वर्गजाणीवेतून मांडतांना दिसतो. कुल्फी न परवडण आणि ती न मिळण यात बालपणाचा तो करपलेला अनुभव.(हा अनुभव व्यवस्थेच्या महाकाय चौकटीत पहिला तर क्षुल्लक वाटेल. कारण ज्या सभ्यतेत दुःखाच्या अहमहिका चालतात तिथे हे असं काही व्यवस्थेला दखलपात्र नसणं यात चुकीच काही नाही.) आणि त्याचं प्रतीक म्हणून घशात गोठून येणारा त्याच्या आतला बर्फ. जो अभावाचा निदर्शक आहे.

इथे वरती मला जाणवलेली भावावस्था सलग राहिली नाही. याची एक गंमत इथे आहे. माझ्या घरी येणारा बालिया 2 रुपयाची अशी त्यावेळी भारीतली वगैरे मावा कुल्फी आणायचा. आणि तो आला हे त्याच्या घंटेने कळायच. मला ती दुधाळ पांढरट मावा कुल्फी आवडत नसायची . बर्फाची रंगीबेरंगी गारिगार मी घरी मागायचो. हा गारिगारवाला त्याच्या अगोदर एक तास येऊन जायचं. ही नुसत्या बर्फाची साखरेची गारिगार मी खाऊ नये आणि आजारी पडू नये म्हणून ही कशी हलकी आणि दुसरी ती कशी चांगली दुधाची वगैरे मी अनेकदा ऐकल्याचे आठवते . मी रडायचो ते ही बळजबरी दिलेली मावा कुल्फी आवडायची नाही म्हणून. सांगायचा मुद्दा असा यातला अभावाचा मुद्दा मी वाचक म्हणून थेट अनुभवलेला नसला तरी माझ्या वेगळ्या प्रकारच्या (भलेही त्या दुःखद नसतील आज हास्यास्पदही वाटतील अशा ) आठवंनींना ट्रीगर करण्याची ताकद या वरच्या दोन ओळींमध्ये मला जाणवली. हे असं आठवून काय मिळतं ? म्हंटलं तर बरच म्हंटलं तर काहीच नाही.

दूसरा भाग येतो तो कवितेतल्या त्याच्या जुन्या अभावाच्या ‘आठवणीचा’ भाग म्हणून. गाभा अभावाचाच राहतो. इथे फक्त समोर असलेली ‘उपलब्धता’ त्या अभावाला जागं करते इतकच . पण ती नुसती जग बदलले आहे, आमच्या वेळी असं नव्हतं… किंवा हे नॅचरल्सचं आईसक्रीम कसं खोट्टखोट्ट नैसर्गिक आहे वगैरे म्हणून गळे काढणारी नाहीय. म्हणजे ती परंपरा किंवा जुने दिवस विरुद्ध नवे दिवस असा काही संघर्ष उभा करत नाही. बालपणात राहून गेलेल्या अनेक इच्छा मध्यमवर्गीय जाणिवांमुळे स्वतःच्या अपत्यांच्या सुखात शोधण्याची कुप्रथा मराठी समाजात रुजलेली मला जाणवलेली आहे. त्यात आता यांना तरी मिळतय मग झालं असा भाव या वडील – आयांच्या मध्ये मला जाणवलेला आहे. विशेषतः पहिल्या पिढीच्या शिक्षणांतर कृषि ते नोकरी असा प्रवास झालेल्यांमध्ये तो सरसकट पाहता येतो . त्यांच्या आताच्या अवस्थेत ‘भूक मरणे’ हा भाव बघायला तुम्हाला मिळू शकतो. मग ते ही भूक मारतात आणि ती तशी मारणे हे कसे थोर आहे हे स्वतःला सांगतात..शिवाय आणखी उच्चउच्च वर्गीय लोक कसे आपल्यासारखे नसतात म्हणून स्वता:ला गोंजारूनही घेतात. पण हा सर्व भौतिक दमनातून आलेला खोटा सांस्कृतिक अहंगंडच असतो.

दुसर्‍या भागातल्या शेवटच्या ओळी- वर जे काही म्हंटलं आहे , त्यातलं काही समोर न आणता मोठ्या झालेल्या माणसातली बालपणाची तहान तेवढी दाखवतात आणि थांबतात. मला हे स्पर्शून गेलं. वरवर पाहता ही आधुनिकतेने आणलेल्या सुबत्तेवरची आणि जीवन शैलीवरची टीका आहे म्हणून गल्लत इथे होऊ शकते. पण या कवितेत मला तो भाव जाणवला नाही , हे मला विशेष वाटतं.

आणि शेवटचा तिसरा भाग !! खास मध्यमवर्गीय अपरिहार्यता आणि अटळतेच प्रतीक म्हणून हे घट्ट चिकटलेल विरून टाकलं जाणं . आणि हे विरून जात असतांना आपोआप आध्यात्मिक होत जाणं. अनुभवाची भूत -वर्तमान-भविष्य या कालमापनातील वर्तुळाकार गणती सुरू होत जातांना जाणवते. बाहेरच ऊन की थंडी की घशातली तहान या अनुभवांच गरगर फिरणं इतक्या एकजिनसी पद्धतीने वाचकाला जाणवतं की हा वितळत जाणारा सुरुवातीचा अभावाचा अनुभव प्रत्येकाच्या आतल्या न मिळत्या अनुभवांना वितळवून टाकू शकतो. अर्थात हे ज्याच्या त्याच्या संवेदनेवर अवलंबून.मला हे भावलं . तसंही कविता वाचण्याचे दिवस इथे काही राहिले नाहीत. कवितेची टर उडवण आज खरं जास्त प्रतिष्ठेचं. शिवाय तिचे पुरस्कार , प्रतिक्रिया गाजवण हे जास्त महत्वाच आता.

मला कविता आवडली हे आहेच पण माझा मित्र इग्न्याशिअस अनेक दिवसांनंतर कविता लिहायला लागलाय हे बघून बरं वाटलं.

आता या पसार्‍याला कुणी उगी छोट्याश्या कवितेचा – राईचा पर्वत करणे असं म्हणूही शकेल. पण माझं म्हणणं जुनंच आहे . राईतून पर्वत उभा करणारी तिच तर कविता…बसल्या जागेवरून लांबवर पाहू शकणारी कविताच फक्त … नक्की वाचा.

______________________

अॅडहौक आध्यात्मिकतेची कविता

इग्नेशियस डायसची काही दिवसांपूर्वी वाचलेली ही कविता . अॅडहौक(तात्पुरती) शांततेची , अॅडहौक आध्यात्मिकतेची ही कविता आहे . मग माझ्या डोक्यातल मॅजिक उचंबळून वर येतं ही ओळ कवितेत पुन्हा पुन्हा येते . या ‘मग’ मध्ये काय आहे ? दृश्य पातळीवर सोशल मीडिया आणि सतत बोलत राहण्याच्या सार्वत्रिक विकाराची पार्श्वभूमी यातल्या काही ओळींमध्ये आहे . सतत व्यक्त होत राहणं , सतत Consume होत राहणं आणि त्याचवेळी आतल्या शांततेच्या शोधाचा क्षीण होत चाललेला आवाज ऐकण , तो आवाज ऐकू येत राहावा यासाठी धडपड करण ,तो आवाज हरवू नये यासाठी सतर्क असणं आणि साध्या भाषेत सांगायचं तर कळत असूनही वळत नसणं -यासाठीचा हा ‘मग’ आहे. प्रत्येकवेळी नवीन दृष्टांताची गरज असणं आणि तो मिळाल्यावर पुन्हा शांततेच्या मार्गावर चालणं ही अटळता, अर्धवट आध्यात्मिक शोध घेतलेल्या समाजाचे भागध्येय असतेच ; असे नसते तर मौन होणं त्याला किंवा तिला केव्हाच साधलं असतं .परंतु मौन होणं आणि आधीची जगरहाटी घेऊन फिरणं या दोहोंच्या मध्यात ही चिन्हं येऊन पडतायतं हेही गरजेचे आहेच . हा मधला संघर्ष तितक्या भेदक पद्धतीने ,चिन्हांवरच्या हुकूमतीने तसाच्या तसा मांडू शकणारे आणि त्याचबरोबर समस्येची व्यापक जाण असणारे, केवळ तर्क या एकमेव हत्यारावर अवलंबून नसणारे , आध्यात्मिकता जाणणारे जे समकालीन कवि आहेत त्यात महेश लोंढे Mahesh Dattatraya Londhe, इग्नेशियस डायस आणि सत्यपालसिंग राजपूत Satyapalsingh Rajput ही महत्वाची नावे आहेत . सर्जनशील कलावंताला श्रद्धा , बुद्धी आणि तर्क या कांटच्या विचारांची जोड असल्यास त्याचा शोध multi faceted होऊ शकतो असं या तिघांकडे पाहिल्यावर लक्षात येतं . या तिघांची कविता पुढे कशी येईल , ती काय वळण घेईल याची एक उत्सुकता मला कायम असते.

इग्नेशियसची ही कवितासुद्धा याच गोष्टींचा धांडोळा घेते .

‘मग हे सगळं मी नसतं केलं तरी चालल असतं’

‘मग माझ्या मेंदूतल कौतुक आटत जातं’

‘मग मी विचारांना घाम येईल इतकं संडासात बसायचं नाही हे ठरवतो’

‘मग आपण काही लिहुयाच नकोत वर शिक्कामोर्तब होतं’

या ओळींमध्ये तो ‘मग’ आहे . या ओळी प्रातिनिधिक आहेत . केवळ सोशल मीडिया , इलेक्ट्रोंनिक उपकरणं यांनी व्यापलेला भवताल आणि त्याचे पेच इतका मर्यादित अवकाश यात नाहीय . मुळात आत्मिक शांतता भंग होईल आणि नैसर्गिक सर्जन मृतवत होईल अशा अनेक गोष्टी समष्टीत असतात. भागध्येय असेल किंवा जाणीवपूर्वक विकारांच्या आहारी जाऊन ती आत्मिक शांतता तोडण्याची तरतूद सामान्य व्यक्ती करतच असते . भांडवली व्यवस्था , अनागोंदीच राज्य , चंगळवादी बाजार- या आणि इतर बाबी या प्रवृत्तीला आणखी गडद करण्याचं काम करत असतात . या अर्थाने ही कविता केवळ मर्यादित काळाची राहत नाही . संदर्भ बदलले तरी स्वसंवाद आटत जाण्याचा धोका , निवेदनाला करावा लागत असलेला प्रत्येक काळातला संघर्ष असतोच .त्याला भिडन्याचा मार्ग जरी या कवितेत नसला तरी मौनापूर्वीची फडफड व्यक्त करण याचं महत्व कमी होत नाही . आणि तसंही कलाकृतीने गणितासारखा उपाय द्यावा असेही नसतेच . नाहीतर ती कलाकृती राहणार नाही .

शेवटी जो बायकोचा संदर्भ येतो त्यात कविता बाहेरच्या Generic अनुभवातून आत येत पुरुषी संवेदना प्रकट होते.बायकोशी हरवलेला संवाद इतक्या खाजगी पातळीवर ती येते . अर्थात इथेही ती प्रतिकात्मकच आहे . हरवलेला संवाद ही सुद्धा या अस्वस्थतेचीच देणगी आहे . मग ती बायको असो वा मित्रमैत्रीण .

या कवितेतली भाषा , लय मला आवडली आहे . अर्थात ‘मग मी ‘ ची पुनरुक्ती मजा आणणारी असली तरी आधीच्या अनेक कवितांमध्ये ती आहे . यावर भाषेच्या अंगाने काही होऊ शकते का ते पाहायला हवं . बाकी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या ओळीला जे फिरवल आहे ते वाचतांना मजा आली . इगनेशियसचा एरवी न दिसणारा खोडकरपना काही ओळींमध्ये दिसतो . तो मला आवडला .

मुख्य प्रश्न आहे वाचकाला यातून काय मिळतं ? ज्याचीत्याची शांतता क्षणभरासाठी क्लिक करवून देण्याची क्षमता या कलाकृतीत आहे . ती मिळाली की धरून ठेवायची की स्क्रोल करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. Love Ignatius Dias

(Mahesh Leelapandit ने या कवितेच छान पोस्टर केलं आणि ते शेअर केलं त्याबद्दल आभार )

______________________

काही कवितांमध्ये म्याड्नेस असतो ,इग्नेशियस च्या या कवितेत ‘controlled madness ‘ आहे . सैरावैरा भावावस्थेला पकडून उलटसुलट करून पाहणं , तिचा रंग , तिचा पोत , तिचा पदर , तीच अंतरंग असं एक एक करत तो बघत राहतो . तथाकथित अंगावर वगैरे येणारी ती कविता नसते . ती ताबा घेते . Conquest of mind ! चांगल्या कवितेत रूपक आणि कविता सुट्या राहत नाहीत त्यातली ही कविता . mandness किवा वेडसरपणाला वेगळं परिमाण देणारी ही कविता आहे . मला आवडणारं अतिप्रिय अस Abstract असणं या कवितेत ठासून आहे . विशेष म्हणजे abstract ठेवूनही ज्या पद्धतीने तिचे पदर हळूहळू ज्या सहजतेने उलगडत जातात त्याच कारण एकच – निर्मितीच्या वेळचा तिचा सहजभाव . it paved its way through consciousness from that inner self . आणि तिथेच वेदना , अस्तित्व , कोंडमारा , अपराधगंड , भय , एकटेपणा यांचं कोलाज तयार होत .. त्यांचं प्रमाण जितकं आत आहे तितकच कवितेतही टिकून राहतं . प्रामाणिकपणा आणि कन्फेशन जेव्हा abstract रूपात अवतरते आणि तीही चिडचिड न करता तेव्हा ही अशी कविता होते . जी या भावावस्थेतील इतरांना मोकळ करून जाते . क्याथोर्सिस म्हणजे आणखी काय . मला भावलेली कविता

आपण पाहिले जातोय

आपण पाहिले जातोय

जळी स्थळी पाहिले जातोय

काष्ठी पाषाणी

मॉली मल्टीप्लेक्सी

स्कुली कॉलेजी

रेल्वेस्टेशनी बस्टँडी

पाहिले जातोय

आपण

 

तू आधीपासूनच

होतास यत्र तत्र

आताही आहेच

तुझा सुक्ष्मदर्शी डोळ्यांचा कॅमेरा

सर्वत्र

 

आपण पाहिले जाऊ ची

आदिम भीती आणि

तुझं दहशतवादी अस्तित्व

आमच्या मनात कायम

 

आमच्याच डोळ्यांनी तू पाहतोस

आमचं सिकुडलेलं अंग

कविता लिहिणं

बाथरुमातील हस्तकौशल्य

मेंदूत पॉपपणारी उंची स्वप्नं

उसळून आलेली सेक्सेच्छा

काहीच होवू शकत नाही नजरेआड

 

ऐन ऑरगॅजमच्या आधीच

गुंडाळून घेतलेलं अंग

सूक्ष्म सूक्ष्म

पाहिलं जाण्याच्या पलीकडे

तिथेही हजर

तुझी चाणाक्ष नजर

 

कान असायचे भिंतींना

आता डोळेही उगवून आलेत

 

ऐकली जाईल कारस्थानी कुजबूज

बघितली जाईल संशयास्पद हालचाल

सुटेल गोळी डोळ्यातून

घुसेल आरपार

देहापार

उघडे पाडेल मनसुबे

 

आपण कधीच न रचलेले

 

चुकूनही पापणी न मिचकावणारा

हा महाकाय डोळा

पाहतो आपल्या आत

खोलवर

 

आपल्यालाही माहीत नसलेल्या

आपल्या अपराधांचा

पाढा

त्याला तोंडपाठ

 

आपल्या इतक्या निकट

नव्हता डोळा याआधी कधीही

 

नव्हती इतकी दहशत

डोळ्यांची

की

विचारही

उमटण्याआधी मनात

हज्जारदा करतात विचार

 

मीच पाहतोय माझ्याकडे

 

माझ्याकडे पाहणार्‍या मीला

मी पाहतोय

 

मी पाहतो

माझ्याकडे पाहणार्‍या मीला

पाहणार्‍या मी कडे

 

मी आणि पाहणं

यांतलं आटत जातं

अंतर

 

पाहिलं जावू नये

हे शरीर

म्हणून कपडे घातले

तर कपड्यांना लगडलेले आतून

अंगांग न्याहाळणारे

सीसीटीव्ही सर्वज्ञ

कपड्यांच्या आतील आपला नग्नपणा

करीत अधोरेखित

आतल्याआत धांगडधिंगा

 

सर्वज्ञासमोर मी नंगा

 

कुठेच नाहीये डोळा

तरी पाहिलं जाण्याची क्रिया अविरत

 

डोळाच एकमेव पाहू शकतो

ह्या शक्यतेने कधीचेच मिटलेत डोळे

 

डोळे बंद

पाहणं सुरू

 

डोळेबंद

पाहणंसुरू

 

डोळेबंदपाहणंसुरू

डोळेपाहणं

 

पाहणं

 

साक्षात्कार